Thursday 29 December 2016

रिटायर झाल्यावर आपण दोघं मज्जा करू!!!



'मायबोली' या मराठी संकेतस्थळावर प्रसिद्ध केलेला माझा हा लेख.
          

          दरवर्षी नोव्हेंबर-डिसेम्बर मध्ये मी माझ्या कुटुंबाला घेऊन भारतातील रमणीय स्थळी सात-आठ दिवस पर्यटनाला जात असतो. पण ह्यावर्षी काही अपरिहार्य कारणामुळे आमचा पर्यटनाला जाण्याचा बेत रद्द करावा लागला.

          काल संध्याकाळी मी आणि सौ. अशाच घरगुती गप्पा मारत बसलो होतो. तेव्हा आमच्या ह्यावर्षी रद्द झालेल्या पर्यटनाचा विषय निघाला. तेव्हा मी पर्यटन रद्द केल्याने फार वाईट वाटतंय असं म्हणालो. त्यावर सौ. लगेच म्हणाली. "का वाईट वाटून घेताय? त्यात काय एवढं? आता नाही जमलं तर नंतर जाऊ. अजून काही वर्षांनी तुम्ही रिटायर झालात ना, कि आपण दोघं मस्त मज्जा करू. सगळीकडे हिंडू फिरू, खाऊ पिऊ, अगदी धम्माल करू."

          त्यावर मी विचार करू लागलो, खरंच कि! नाहीतरी मी काही वर्षांनी रिटायर होणारच आहे. तेव्हा मस्तपैकी भारतच नाही तर अख्खं जग फिरून येऊ. सगळीकडचे स्थानिक उत्तमोत्तम पदार्थ खाऊ. जोडीने हिमालय चढू. माझे पोहणे आणि सौ.चे गायन शिकायचे राहिलंय तेही शिकू. दोघं मिळून नर्मदा परिक्रमा करू. कामाच्या रामरगाड्यात नातेवाईकांशी संबंध दुरावलेत ते पुन्हा जुळवायचा प्रयत्न करू. नाटक, सिनेमा आणि संगीतमैफिलींचा धूमधडाका लाऊन टाकू. मी निवृत्त झाल्यावर आमच्या मनात राहिलेल्या सर्व इच्छा पूर्ण करू. जोडीने अगदी मज्जा मज्जा करू.           मग पुन्हा माझ्या मनात विचार आला कि खरंच! मी निवृत्त झाल्यावर आम्ही ठरवलेल्या आमच्या सर्व इच्छा पूर्ण करू शकू का? मी निवृत्त होईल तेव्हा आमच्या दोघांचं वय चांगलंच वाढलेलं असेल. आमचे हातपाय थकलेले असतील. विविध प्रकारची आजारपणं मागे लागलेली असतील. शरीराची इंद्रिये काम करेनाशी झालेली असतील. तेव्हा विविध प्रकारची व्यंजने खाऊ शकू का? जगभर फिरायला, नर्मदा परिक्रमा करायला, हिमालय चढायला, नातेवाईकांकडे जायला हातपाय साथ देतील का?

          कारण आपल्याला असे बरेच निवृत्त झालेले दिसतात. ज्यांचं निवृत्ती नंतरचं पहिलं वर्ष स्थिरस्थावर होण्यामध्ये जाते. पुढचं वर्ष उत्साहाने विविध उपक्रम अंमलात आणण्यात जाते. मग पुढील काही वर्षात हळूहळू विविध कारणांमुळे उत्साह मंदावत जाऊन, शेवटी येणारा रोजचा दिवस, पूर्ण दिवसभर घरी बसून खिडकीबाहेर शून्यात बघण्यात जात असतो          येथे मायबोलीवरील बरेच सभासद निवृत्त झालेले असतील. किंवा काही जणांचे आईवडील किंवा त्यांचे नातेवाईक आणि ओळखीचे लोकं निवृत्त झालेले असतील. अशा सभासदांना मला काही विचारायचंय. आपणांस अशा काही निवृत्त झालेल्या व्यक्तींचे अनुभव माहित आहेत का? ज्यांनी निवृत्त व्हायच्या दोन पाच वर्षे अगोदर मनात काही इच्छा, योजना आखल्यात, कि आपण निवृत्त झाल्यावर हे करू आणि ते करू, आणि आता त्याप्रमाणे निवृत्त झाल्यावर, पूर्वी आपल्या मनात असलेल्या इच्छा, योजना विविध अडचणी येऊनही ते त्या अंमलात आणत आहेत किंवा त्यांनी त्या पूर्णत्वास नेलेल्या आहेत.           मला स्वतःला अशी दोन चार उदाहरणं माहित आहेत. त्यांच्या विषयी सांगतो. माझ्या ऑफिसमध्ये एक डिसुझा नावाचे सहकारी होते. त्यांना धार्मिक गोष्टींची आवड होती. पण नोकरीमुळे ते त्या गोष्टीला जास्त वेळ देऊ शकत नव्हते. आता निवृत्तीनंतर गेले काही वर्षे ते पूर्णवेळ धर्म प्रसारकाचे काम करत असतात. दुसऱ्या एका सहकाऱ्यांना कामगार कायद्यात रस होता. निवृत्तीनंतर ते आता अन्याय झालेल्या कामगारांना मोफत कायदे विषयक सल्ला देण्याचे काम करीत असतात. दुसरे एक माझे नातेवाईक होते. त्यांना पूर्वीपासून शेतीत रस होता. पण नोकरीमुळे शेती करणेे शक्यच नव्हते. पुढे निवृत्तीनंतर जमीन विकत घेऊन ते बरीच वर्षे शेती करीत होते.

          आपणांसहि अशा लोकांची उदाहरणे माहित असतीलच, ज्यांनी निवृत्तीनंतर नुसतं घरी बसून न राहता, आलेले दिवस ढकलत न राहता, आपले निवृत्तीनंतरचे आयुष्य, त्यांनी नोकरी करत असताना पाहिलेल्या स्वप्नांची, इच्छांची पूर्तता करण्यात खर्च केले. अशी उदाहरणे आपण येथे दिलीत तर जे यापुढे निवृत्त होणार असतील, त्यांना त्यातून काही बोध घेता येईल. अशां उदाहरणांतून त्यांना काही प्रमाणात दिलासा, नवीन कल्पना, हुरूप आणि स्फूर्ती मिळेल.

No comments:

Post a Comment