Friday 12 May 2017

भारत पाक युद्धातील एक आठवण.


          भारत पाकिस्तान युद्ध आठवते. तेव्हा आम्ही सायनला रहायचो. शत्रूची विमाने मुंबईवर आली की सगळीकडून जोराने सायरन वाजायचे. घरातून सर्व लोक बाहेर पडून मैदानात जमायची. रात्र असली की ब्लॅक आउट केला जायचा. म्हणजे संपूर्ण मुंबईची लाईट घालवायचे. शत्रूच्या विमानांना दिशाभूल करण्याकरिता सगळीकडे अंधार केला जायचा. सगळ्यांनी आपल्या घराच्या खिडक्यांच्या काचांना ब्राऊन पेपर लावायची ऑर्डर निघाली होती. आम्ही घरात समयीच्या प्रकाशात बसायचो. एवढं करूनही रस्त्यावरून कोणाच्या घरात प्रकाश दिसला तर लोकं आरडा ओरडा करून घरावर दगडफेक करायची.

          एकदा आठवतं सायरन वाजले, ब्लॅक आउट झाला, आम्ही सगळे रस्त्यावर उतरलो.  सगळ्यांना भीती आता काय होतंय? आणि मग मागच्या ट्रॉम्बे, BARC येथून शत्रूच्या विमानावर गोळाफेक चालू झाली. एकामागोमाग एक, दहा वीस लालबुंद प्रकाशमान बॉम्ब गोळ्यांची माळ शत्रूच्या विमानाचा वेध घ्यायला आकाशात उडू लागली. लोकं बोलायला लागली, बॉम्बकडे पाहू नका, आंधळे व्हाल. दुसऱ्या दिवशी पेपरमध्ये शत्रूची दोन विमाने पाडल्याची छायाचित्रे छापून आली होती.

No comments:

Post a Comment